http://thebattleforsanskrit.com/synopsis/
सारांश – “द बॅटल फॉर संस्कृत”
लेखक : राजीव मल्होत्रा, मराठी अनुवाद : नारायणी बर्वे
सध्या भारतात पाश्च्यात्तीकरणाला आव्हान देणारी एक नवीन जागृती सुरु आहे. अमेरिकेत ज्या विचारधारेचा उगम झाला, त्या विचारधारेचा पगडा आणि वर्चस्व आता भारतातील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर दिसून येत आहे, असा इशारा ‘द बॅटल फॉर संस्कृत’ या पुस्तकातून संस्कृत आणि संस्कृती मध्ये पारंगत असलेल्या भारतीय सभ्यतेतील पारंपरिक विद्वानांना देण्यात येत आहे. या अमेरिकन विचारधारेचे शैक्षणिक क्षेत्र इंडॉलॉजी किंवा संस्कृत अभ्यास या नावाने ओळखले जात असून संस्कृत ग्रंथ हे प्रतिगामी विचारसरणीचे व त्या ग्रंथांतील विचारधारा विषमय आहे असे आधुनिक भारतीय समाजाच्या मनावर बिंबवण्याचा स्पष्ट उद्देश या पाश्चिमात्य इंडॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांचा आहे. संस्कृत ग्रंथ प्रामुख्याने सामाजिक अन्यायासाठी व उच्चभ्रू लोकांची प्रतिष्ठा जपण्यासाठी लिहिले गेले, असे या विद्वानांचे मत आहे. त्यामुळे त्यातील पावित्र्यावर आक्षेप घ्यायला हवा किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी करायला हवे व त्यासाठीच सध्याच्या आधुनिक समाजाने संस्कृत ही एक मृत भाषा आहे असे मानायला हवे, असेही या विद्वानांचे मत आहे. संस्कृत आणि संस्कृती विषयातील पारंपरिक तज्ज्ञ या विचारधारेला पूर्णपणे नकार देतील किंवा त्यावर आक्षेप घेतील असे लेखकाचे मत आहे.
हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या शृंगेरी पीठाबरोबर एका प्रकल्पावर काम करत असताना, पीठातील आणि पर्यायाने सनातन धर्मातील शिकवणुकीकडे, पाश्चिमात्य दृष्टीकोनातून बघितल्यास, दिशाभूल होण्याचा गंभीर धोका राजीवजींना जाणवला. त्यानंतर राजीवजींनी पाश्चिमात्य इंडॉलॉजीविषयी अभ्यास करण्यास प्रारंभ केला. या शोधकार्यात “पाश्चिमात्य इंडॉलॉजी” नक्की कुठे चुकते आहे, आणि पारंपारिक तज्ज्ञांच्या मते संस्कृत ग्रंथ काय सांगतात, याचे बारकावे ठळकरित्या मांडण्याचे काम राजीवजींनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.
“द बॅटल फॉर संस्कृत” या पुस्तकात दोन्ही वैचारिक विचारधारांतील महत्वाचे मुद्दे, त्याबद्दलची जागरुकता आणि त्यासंबंधी संशोधन उत्तमरीत्या एकत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे दोहोंपैकी कोणतीही विचारधारा जोपासणाऱ्यांसाठी हे एक वाचनीय पुस्तक आहे. एका जिव्हाळ्याच्या विषयाकडे पाहण्याचे दोन परस्पर भिन्न दृष्टीकोन कसे असू शकतात, हे सांगण्यात या पुस्तकाचे महत्वाचे योगदान आहे. हे दोन्ही दृष्टीकोन मर्यादित आहेत, की या दोन्ही दृष्टीकोनांना सांधणारा एखादा दुवा असू शकतो हे प्रत्येक वाचकाने स्वत: ठरवावे.
Translated by – Narayani Barve